महाराष्ट्र माझा

खळबळजनक: आंतरराज्यीय वाहनचोरीचे करडी (धाड) “कनेक्शन” 

धाड,(प्रतिनिधी) : राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील महागड्या चारचाकी गाड्यांच्या चोरीचे धागेदोरे आता चक्क धाडनागरी (ता.बुलढाणा) पर्यंत आहे, ही बाब काही नवीन नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मध्य प्रदेश पोलिसांचे एक विशेष पथक धाडमध्ये तळ ठोकून आहे. विशेष म्हणजे या पथकाची हालचाल अत्यंत गुप्त असून स्थानिक पोलिसांनाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. त्यामुळे ही “मोठी गडबड” नेमकी काय आहे, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
धाडनगरीचे नाव गेल्या काही काळापासून आंतरराज्यीय वाहन चोरीच्या प्रकरणांमध्ये सातत्याने समोर येत आहे. देशभरातील विविध राज्यांतून लक्झरी गाड्या चोरणारा आणि पोलिसांना हवा असलेला वाहन चोरीच्या टोळीतील बेताज बादशहा धाड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या करडी येथील रहिवासी आहे. शेकडो गुन्ह्यांची नोंद असलेला हा “मोस्ट वाँटेड” सध्या करडीमध्ये वास्तव्यास आहे. त्यामुळेच महाराष्ट्रच नव्हे, तर परप्रांतीय पोलिसांच्या गाड्यांचा राबता या भागात नेहमीचाच झाला आहे. मात्र, यावेळी मध्य प्रदेश पोलिसांनी केलेला दोन दिवसांचा मुक्काम हा कोणत्या तरी मोठ्या कारवाईचा पूर्वसंकेत मानला जात आहे.
बऱ्याच वेळी दुसऱ्या राज्यातील पोलीस एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी तिसऱ्या राज्यात जातात, तेव्हा ते स्थानिक पोलीस ठाण्यात आपली नोंद करतात. गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक पोलिसांची मदत घेतात. मात्र, या पथकाने अद्याप स्थानिक स्तरावर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पोलिसांचे हे “आणा जाणा तो लगा रहेगा”, असे स्वरूप असले तरी, गुपचूपपणे सुरू असलेला हा तपास एखाद्या “मोठ्या माशा”ला जाळ्यात ओढण्यासाठी असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दोन दिवसांपासून मध्य प्रदेशची टीम शहरात फिरत असून त्यांनी काही संशयित ठिकाणांची रेकी देखील त्यांनी केली आहे. मात्र, त्यांचा उद्देश गुलदस्त्यात असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि तेवढ्याच उत्सुकतेचे वातावरण आहे.
वादळापूर्वीची शांतता
करडी (धाड) मधील या चोरट्यावर शेकडो गुन्ह्यांची नोंद असून त्याचे जाळे थेट दिल्ली, मुंबई, मध्य प्रदेश आणि गुजरातपर्यंत पसरलेले आहे. महागड्या गाड्या अवघ्या काही मिनिटांत गायब करण्यात त्याचा हातखंडा आहे. चोरलेल्या गाड्यांचे इंजिन नंबर आणि चेसिस नंबर बदलून त्यांची विल्हेवाट लावण्याचे “रॅकेट”या परिसरातून चालते का? याचा तपास तर मध्य प्रदेश पोलीस करत नाही ना?, त्यांच्या मुक्कामामागे हेच कारण तर दडलेले नाही?, अशी शंका येत आहे. दरम्यान, पोलिसांच्या गाड्यांचा वावर वाढल्याने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. हे पथक दोन दिवसांपासून करडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात फिरत असल्याने कोणावर आणि कोणता “ट्रॅप” होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्हेतर त्यांचा दोन दिवसांचा मुक्काम म्हणजे मोठ्या वादळापूर्वीची शांतता असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *