शेळगाव आटोळमध्ये महिलेचा विनयभंग करत मारहाण
अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): शेळगाव आटोळ (ता.चिखली) येथे मुलाला अंगणवाडीत पाठवण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून आरोपींनी एका महिलेला मारहाण करून तिच्या मुलीचा विनयभंग केला. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांत चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
शेळगाव आटोळ येथील रहिवासी असलेल्या शोभा प्रकाश बोर्डे (वय ४५ वर्षे) यांना १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आरोपी स्नेहलता संजय बोर्डे हिने “तुमच्या मुलाला अंगणवाडीत पाठवू नका, तुमचे मुले सांभाळायला मी मोकळी नाही”, असे म्हणून वादाला सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेल्याने आरोपी स्नेहलता हिने शोभा बोर्डे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. आईला मारहाण होत असायचे पाहून शोभा बोर्डे यांची मुलगी अश्विनी विनोद सुरडकर ही भांडण सोडविण्यासाठी गेली असता, आरोपी लिंबाजी किसन आराख आणि मधुकर जाधव यांनी अश्विनीचे दोन्ही हात पकडून तिला जागीच रोखून धरले. आरोपी संजय उत्तम बोर्डे याने अश्विनीचा वाईट उद्देशाने विनयभंग केला.
याप्रकरणी पीडित महिलेने अंढेरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी स्नेहलता बोर्डे, संजय बोर्डे, लिंबाजी आराख आणि मधुकर जाधव (सर्व रा.शेळगाव आटोळ) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, ११५ (२), ३५१ (२), ३५२ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार गणेश देडे हे करीत आहेत.

