क्राईम जगत

धाडचा अक्षय बिलंगे एका वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध

बुलढाणा,(प्रतिनिधी): जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या नेतृत्वात बुलढाणा पोलीस प्रशासन आता अधिक आक्रमक झाले आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने, धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या अक्षय जीवनलाल बिलंगे (वय २३ वर्षे) रा. धाड याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली असून जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याला एक वर्षासाठी बुलढाणा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती ठाणेदार प्रताप भोस यांनी दिली. या कारवाईमुळे बुलढाणा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

धाड पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये गेल्या काही काळापासून अक्षय बिलंगे हा धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सक्रिय होता. एकटा गुन्हे न करता, त्याने आपली एक संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. त्याच्यावर वारंवार गुन्हे दाखल होऊनही आणि पोलिसांनी यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाया करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा दिसून आली नाही. उलट, त्याचे गुन्हेगारी कृत्य दिवसेंदिवस वाढतच चालले होते. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी सन २०२६ मध्ये जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशनला सराईत गुन्हेगारांवर कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने धाड ठाणेदार प्रताप भोस यांनी अक्षय बिलंगे याच्या गुन्हेगारी कुंडलीचा सविस्तर अहवाल तयार केला. त्याच्या गुन्हेगारी पद्धतीमुळे धाड गावात आणि परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याची दहशत वाढल्याने सामान्य नागरिक त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी किंवा साक्ष देण्यासाठी समोर येण्यासही घाबरत होते. ही दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी एमपीडीए सारख्या प्रभावी कायद्याचा वापर करुन अक्षय बिलंगे याच्या विरुद्ध ‘महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ पायरट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती’ यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, १९८१ (सुधारणा २०१५) च्या कलम ३ (१) नुसार स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला होता. सदर प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत जिल्हा दंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सर्व पुराव्यांची आणि धाड परिसरातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीची पडताळणी केल्यानंतर, अक्षय बिलंगे याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले आहे. त्यामुळे धाड परिसरासह बुलढाणा तालुक्यातच चांगलीच खळबळ उडाली आहे.

भविष्यातही कारवाया सुरूच राहणार

या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या धाडसी पावलाचे सामान्य जनतेतून स्वागत होत आहे. वारंवार गुन्हे करून सामाजिक शांतता भंग करणाऱ्या इतर गुन्हेगारांवरही भविष्यात अशाच प्रकारची कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा ठाणेदार प्रताप बोस यांनी दिला आहे.

यांनी केली कामगिरी फत्ते

पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाड ठाणेदार प्रताप भोस, स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील अंबुलकर, पोउपनि परमेश्वर केंद्रे, पोलीस अंमलदार भास्कर जाधव आणि पोलीस अंमलदार संजय भुजबळ यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *