स्मार्ट बुलढाणा

मनाच्या शांतीसाठी आणि तणावमुक्त जीवनासाठी परमात्मा शिवाची स्मृती व अध्यात्माची जोड आवश्यक

अभिनय बोर्डे

धाड (प्रतिनिधी): महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या धाड शाखेमध्ये उत्साही वातावरणात झेंडावंदन आणि आध्यात्मिक मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. “मनाच्या शांतीसाठी आणि तणावमुक्त जीवनासाठी परमात्मा शिवाची स्मृती व अध्यात्माची जोड आवश्यक आहे,” असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात अतिशय मंगलमय वातावरणात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून धाड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, ‘सकाळ’ वृत्तपत्र समूहाचे पत्रकार डॉ. विजय जेट्टे, बुलढाणा येथील ब्रह्माकुमारी केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी उर्मिला दीदी आणि ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत केले. यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांना ईश्वरीय भेटवस्तू आणि महाप्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना ब्रह्माकुमारी उर्मिला दीदी यांनी महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व सविस्तरपणे विशद केले. त्या म्हणाल्या की, “आजच्या युगात माणूस भौतिक सुखांच्या मागे धावत असताना आपली आंतरिक शांती गमावून बसला आहे. मनाच्या शांतीसाठी परमात्म्याची आठवण ठेवणे हाच एकमेव मार्ग आहे. आपल्या दैनंदिन जीवनात अध्यात्माची सांगड घातल्यास जीवन अधिक समृद्ध आणि आनंदी होते.”

पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे यांनी पोलीस दलातील कामाचा ताण आणि सामाजिक परिस्थितीचा उल्लेख करत “आजकालच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात मानवी मनाला स्थिरतेची गरज आहे. ब्रह्माकुमारी विद्यालय ज्या प्रकारे समाजात शांतता आणि मूल्य रुजवण्याचे कार्य करत आहे, ते अत्यंत कौतुकास्पद आहे.”, असे सांगितले. डॉ. विजय जेट्टे यांनी आपल्या मनोगतातून ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या कार्याचा गौरव केला. “हे विद्यालय केवळ आध्यात्मिक शिक्षणच देत नाही, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी, मग ते डॉक्टर असोत वा पत्रकार, नेहमीच विधायक कार्यक्रमांचे आयोजन करते,” असे म्हणत त्यांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थित सर्व भाविक आणि नागरिकांनी आपल्या जीवनात नैतिक मूल्ये धारण करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. वाईट सवयींचा त्याग करून आदर्श जीवन जगण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बी.के. सुशांत, प्रदीप टाकसाळ, सुधीर सोनवणे, तुळशीराम सोनवणे आणि सोहम नन्नवरे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी बी.के. संतोष टाकसाळ यांनी उपस्थितांचे आणि पाहुण्यांचे आभार मानले. शांतीपाठ आणि प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *