क्राईम जगत

बुलढाणा जिल्ह्यात खळबळ: लेकी-सुना सुरक्षित आहेत का?

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यात सध्या चिंतेचे ढग गडद झाले असून, घरून कॉलेजला गेलेल्या तरुणी आणि मैत्रिणीकडे जाते म्हणून निघालेल्या महिला अचानक गायब होण्याचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या २४ ते ४८ तासांत जिल्ह्याच्या विविध भागांतून ६ तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत असतानाच, जळगाव जामोद आणि देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दोन नवीन ‘मिसिंग’ गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासकीय यंत्रणा हलली असली तरी, “आमच्या लेकी गेल्या कुठे?” असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.

जळगाव जामोद: कॉलेजला गेलेली ‘गायत्री’ परतलीच नाही!

जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील २१ वर्षीय गायत्री पांडुरंग गावंडे ही तरुणी २० मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता ‘एस.के.के. कॉलेज’ला जाते असे सांगून घरून निघाली. मात्र, सायंकाळ उलटली तरी ती घरी परतली नाही. हवालदिल झालेल्या आई सखुबाई गावंडे यांनी कॉलेज, नातेवाईक आणि मैत्रिणींकडे शोध घेतला, पण गायत्रीचा कुठेही पत्ता लागला नाही. शेवटी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात मिसींग दाखल करण्यात आला आहे. गायत्रीची उंची ५ फूट असून तिने आकाशी रंगाचा टॉप, जॅकेट आणि फिक्कट हिरवी सलवार घातलेली आहे. तिच्या कपाळावर मध्यभागी गोंदलेले टिंब आणि पाठीवर उजव्या खांद्याजवळ तीळ आहे. या घटनेचा तपास पोलीस अंमलदार भागवत उबरहंडे हे करीत आहेत.

देऊळगाव राजा: मैत्रिणीकडे जाते म्हणाली आणि गायब झाली!

दुसरी धक्कादायक घटना देऊळगाव राजा शहरात घडली आहे. सिव्हील कॉलनी येथील ३५ वर्षीय निर्मला व्यंकटराव शिवरकर ही महिला १ मार्च रोजी “बुलढाण्याला मैत्रिणीकडे जाऊन येते” असे सांगून घराबाहेर पडली. २० दिवस उलटूनही निर्मलाचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही. भाऊ धोंडीराम शिवरकर यांनी सर्वत्र शोध घेऊन अखेर २१ मार्च रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात धाव घेतली. निर्मलाचे वय: ३५ वर्ष, बांधा मजबूत, रंग गोरा आहे. या प्रकरणी मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार भास्कर सानप हे करीत आहेत.

४८ तासांचा थरार: ६ तरुणी बेपत्ता; पोलीस यंत्रणेसमोर आव्हान!

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत बेपत्ता होण्याचे प्रमाण भयानक वाढले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण ६ तरुणी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काय हे लव्ह जिहादचे जाळे आहे की मानवी तस्करी? कॉलेजला जाणाऱ्या मुली सुरक्षित आहेत का? सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना जाळ्यात ओढले जात आहे का?, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. देऊळगाव राजा आणि जळगाव जामोद या दोन्ही घटनांमध्ये पीडितांनी “बाहेर जातो” असे सांगून घर सोडले आहे, ही बाब अधिक चिंताजनक आहे.

यंत्रणा कधी जागी होणार?

एकीकडे शासन ‘बेटी बचाओ’च्या घोषणा देत असताना, दुसरीकडे भरदिवसा मुली बेपत्ता होत आहेत. जळगाव जामोदच्या घटनेत गायत्री कॉलेजला पोहोचली होती का? तिचे शेवटचे लोकेशन काय होते? आणि देऊळगाव राजाच्या प्रकरणात निर्मला नेमकी कोणत्या मैत्रिणीकडे जाणार होती? या प्रश्नांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलीस विभागासमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *