नाशिक,(प्रतिनिधी): स्वतःला आध्यात्मिक गुरु आणि भविष्यवेत्ता म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ खरात याच्या पापकर्माचा घडा आता पूर्णपणे भरला आहे. नाशिकच्या शांत वातावरणात अघोरी कृत्यांचा आणि लैंगिक शोषणाचा जो बाजार खरातने मांडला होता, त्याचे एकेक थर आता उलगडू लागले आहेत. आज समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, खरातच्या विरोधात आणखी तीन नवीन महिलांनी तक्रार देण्यासाठी धाव घेतली असून, यामध्ये एका गरोदर महिलेच्या शोषणाचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे.
पापकर्माचा कळस: गरोदरपणातही सोडले नाही!
खरात विरोधात समोर आलेल्या नवीन तक्रारदारांपैकी एका महिलेने दिलेली साक्ष ऐकून पोलीसही सुन्न झाले आहेत. या पीडितेने आरोप केला आहे की, ती गरोदर असताना आणि शारीरिकदृष्ट्या हतबल असतानाही नराधम खरातने तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. “देवाचा कोप होईल” आणि “तुझ्या बाळाला धोका निर्माण होईल” अशी भीती घालून त्याने या महिलेला आपल्या वासनेचे शिकार बनवले. हा केवळ बलात्कार नसून माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे. एका बाजूला आध्यात्मिकतेच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला पदरात बाळ असलेल्या माउलीची विटंबना करायची, असा हा दुहेरी चेहरा आता उघडा पडला आहे.
बनावट साप आणि वाघाची कातडी
खरात केवळ महिलांचे शोषणच करत नव्हता, तर त्याने दहशतीचे एक जाळे विणले होते. तपासात असे समोर आले आहे की, तो आपल्या फार्महाऊसवर येणाऱ्या भाविकांना घाबरवण्यासाठी बनावट साप आणि वाघाच्या कातडीचा वापर करायचा. लोकांना संमोहित करण्यासाठी आणि आपल्या शब्दाबाहेर कुणी जाऊ नये यासाठी तो मध्यरात्री अघोरी विधींचे नाटक करायचा. खोलीत अचानक बनावट साप सोडून किंवा वाघाच्या कातडीवर बसून आपण कुणीतरी ‘दैवी शक्ती’ असल्याचे भासवून तो लोकांच्या मनावर ताबा मिळवायचा. “माझ्याकडे वाघ आणि सर्प योनीतील शक्ती आहेत, जर तुम्ही कुणाला सांगितले तर तुमचा वंश संपवून टाकीन,” अशी धमकी तो पीडितांना द्यायचा,असे देखील समोर आले आहे.
एसआयटीच्या जाळ्यात ‘मोठे मासे’ अडकणार?
आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी आता या प्रकरणाच्या मुळाशी जात आहे. खरातच्या फार्महाऊसवर जे बनावट साप आणि कातडी सापडली आहे, ती त्याने कोठून मिळवली? यात काही वन्यजीव तस्करीचे धागेदोरे आहेत का? याचाही तपास सुरू आहे. तसेच, खरातला पाठबळ देणारे काही पांढरपेशी लोक आणि तथाकथित ‘व्हीआयपी’ भक्त आता भूमिगत झाले आहेत. खरातकडे असलेल्या काही डिजिटल पुराव्यांमध्ये या बड्या हस्तींचे चेहरे दडलेले असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मालमत्तेचा डोंगर आणि गरिबांची फसवणूक
केवळ लैंगिक शोषणच नाही, तर खरातने लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन कोट्यवधींची माया जमवली आहे. तपासात समोर आलेल्या ५२ मालमत्तांच्या सातबाऱ्यांपैकी अनेक जमिनी त्याने ‘अघोरी’ भीती घालून किंवा कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेऊन बळकावल्याचे बोलले जात आहे. ज्यांच्या जमिनी खरातने हडपल्या आहेत, त्यांनी आता न भिता समोर यावे, असे आवाहन तपास यंत्रणांकडून करण्यात आले आहे.
- आता वेळ आली आहे ठोस कारवाईची!
- अशोक खरातसारखे नराधम समाजासाठी कॅन्सरसारखे आहेत. धर्माच्या नावाखाली अधर्म करणाऱ्या या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा होणे हीच पीडित महिलांना मिळालेली खरी न्यायदिक्षा ठरेल. या प्रकरणात केवळ खरातच नाही, तर त्याला मदत करणारे त्याचे हस्तक आणि त्याला ‘संरक्षण’ देणारे राजकीय वरदहस्त शोधून काढणे ही काळाची गरज आहे. खरातच्या या कृत्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायाची आणि आध्यात्मिक क्षेत्राची बदनामी होत आहे. त्यामुळे अशा ‘भोंदू’ बाबांविरुद्ध आता समाजमन पेटून उठले आहे. नाशिक पोलीस या प्रकरणात कोणती मोठी ‘ब्रेकिंग’ कारवाई करतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.(हिंदवार्ता विशेष रिपोर्ट: सत्याचा शोध, न्यायाचा ध्यास!)

Leave a comment