अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): पोटाची खळगी भरण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात आलेल्या एका मजुराचा उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी परतत असताना वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. जयचंद मदनलाल सक्सेना (वय ४० वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ही घटना मलकापूर येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जयचंद सक्सेना हे आपल्या कुटुंबासह जळगाव जामोद तालुक्यातील राणीपार्क येथे मजुरीचे काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना काविळीचा त्रास होत होता. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी आणि पुढील देखभालीसाठी त्यांच्या मूळ गावी (कन्नोज, उत्तर प्रदेश) नेण्याचे कुटुंबाने ठरवले. २६ मार्च २०२६ रोजी जयचंद, त्यांचा भाऊ श्रीचंद, पत्नी देवकी आणि लहान भाऊ रामचंद हे सर्वजण टॅक्सीने मलकापूर रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी आले होते.
उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू
मलकापूर तहसील कार्यालयाजवळ पोहोचले असता, जयचंद यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि प्रचंड घबराहट होऊ लागली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रिक्षाने मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती दुपारी ५.४० च्या सुमारास त्यांना ‘मृत’ घोषित केले.
याप्रकरणी मृतक जयचंद यांचे भाऊ श्रीचंद मदनलाल सक्सेना यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झेडगे आणि पोलीस अंमलदार मो. रिजवान हे करत आहेत.

Leave a comment